दरवर्षी चैत्राच्या अगोदर म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात गावच्या यात्रा सुरू होण्याच्या अगोदर साचातील मूर्ती बनवून देणारे कारागीर आपल्या कुटुंब कबिल्यासह गावात मुक्कामी यायचे. गावातल्या चावडी शेजारच्या उकिरड्याची जागा साफसूफ करून कापडी तंबू ठोकून चांगला महिना-दोन महिन्याचा मुक्काम करायचे. आपण दिलेल्या तांबे-पितळेची मोडीत घातलेली भांडी वितळवून आपल्याला हव्या त्या देवी-देवतांची मूर्ती साच्यातून तयार करून द्यायचे. त्याकाळी बालमनावर मूर्ती बनविण्याचे त्यांचे ‘रॉकेट सायन्स’ अगदी साच्यातील मातीत कोरल्या प्रमाणे मेंदूत कायमचे कोरले गेले. अलीकडे ह्या मूर्ती बनविणाऱ्या भटक्या जमाती फारशा नजरेस पडत नाहीत.
एकीकडे लोहाराच्या भट्टी सारखी कोळशाची भट्टी पेटवून त्यात आपण मोडीत घातलेल्या तांबे-पितळेच्या भांड्यांना वितळविण्याचे काम त्या कारागिराची पत्नी करत असते. यावेळी तो कारागीर एका पत्र्याच्या जाडसर पट्टीवजा साच्याच्या फ्रेममध्ये बारीक चाललेली भुसभुशीत लालमाती भरून आपल्याला हव्या असलेल्या मूर्तीचा साचा बनवीत असतो. एकदा साचा तयार झाला की त्यात वितळविलेला धातूचा रस ओतून तो मूर्ती तयार करून देतो. हे मूर्ती तयार करण्याचं ‘टेक्निक’ बालपणी आम्हाला फार भारी वाटायचं. येणाऱ्या ग्राहकांशी तोडक्या-मोडक्या हिंदी भाषेतून संवाद साधणारा तो कारागीर आपल्या कुटुंबाशी मात्र जवळपास किंचाळतच बोलायचा. त्याची ती भाषा आम्हाला समजत नसायची. म्हणून आम्ही त्याला ‘कोंगाडी’ भाषा म्हणायचो. रंगाने काळे कुळकुळीत असलेले तेलकट त्वचेचे मळकट लोक दिसायला गलिच्छ वाटले तरी त्यांच्याकडे मूर्ती बनविण्याचे ‘रॉकेट सायन्स’ असल्याने आम्हाला फार आदर वाटायचा. शाळा बुडवून दिवसभर त्यांच्या तंबूभोवतीच गराडा करून आम्ही बसलेलो असायचो. साच्यातून तयार होणाऱ्या मूर्त्या आनंद देत होत्याच पण त्याच बरोबर कुणाच्या घरातून किती जुनाट भांडी वितळवायला आली याचा देखील हिशोब ठेवायचो. पुढे वर्षभर दुसऱ्याची ऐपत काढायला त्याचा उपयोग व्हायचा.
लहानपणीच्या या आठवणी ताज्या झाल्या कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लॉक डाऊन पूर्णपणे शिथिल झाल्यावर काल अचानक एक कोंगाडी कुटुंब साच्यातील मूर्ती बनविताना दिसले. अलीकडे ही कारागीर मंडळी फारशी दिसत नाहीत. आता साच्यातील मूर्तीचे फारसे आकर्षण देखील राहिलेले नाही. आता आपण आपल्याला हव्या त्या मूर्त्या ऑनलाईनवर नामांकित आर्टिस्ट कडून मागवून घेऊ शकतो. हे कारागीर देखील उपजीविकेसाठी दुसराच रोजगार करत असतील. कुणास ठावूक ? दीड वर्षाच्या सलग लॉक डाऊनमुळे सगळ्यांचेच रोजगार बुडाले. सगळेच विस्थापिताचे जीवन जगू लागलेत. म्हणूनच हे भटके पुन्हा आपले पारंपारिक उपजीविकेचे ‘रॉकेट सायन्स’ घेऊन आले असावेत का ?
:- मुकुंद मधुकर हिंगणे.